सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सन्मानपूर्वक पुन्हा उभारणी करावी व पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी वाडा तालुका राष्ट्रवादीच्या (अजितदादा) वतीने तहसीलदारांना निवेदन.

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व शिवस्मारक पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा या मागणीसाठी वाडा तालुका राष्ट्रवादी (अजितदादा) यांच्या वतीने गुरुवार (दि. 29 ऑगस्ट) रोजी वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी पालघर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शेलार, राष्ट्रवादी वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य रघुनाथ माळी, विधानसभा संपर्क अध्यक्ष नाना साबळे, युवक अध्यक्ष प्रफुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

यावेळी पूर्व विभाग अध्यक्ष उमेश दळवी, युवक उपाध्यक्ष वैभव पठारे, उपाध्यक्ष सुधीर भोईर, आदिवासी आघाडी तालुका उपाध्यक्ष प्रीतम वाघ, विभाग अध्यक्ष कौशिक पाटील, समीर वेखंडे, महिला आघाडी वैशाली म्हसरे, वैशाली पवार, जेष्ठ कार्यकर्ते कुमार सुतार, प्रकाश भानुशाली यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा आपल्या दैवताचा व महाराष्ट्राचा अपमान झाला असून हा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याची तमाम शिवप्रेमींची संतप्त भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही. या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच महाराजांचा पुतळा पुन्हा नव्याने सन्मानपूर्वक उभारण्यात यावा, ही वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जाहीर मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *